19 July, 2013

भगवान तथागतांनी संगरव नावाच्या मनुष्याला हा उपदेश केला . .

एकदा श्रावस्तीच्या जेतवन विहारात राहत असतांना भगवान तथागतांनी संगरव नावाच्या
मनुष्याला त्याच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल हा उपदेश केला .

ज्यावेळी कामविकाराने मनुष्याचे चित्त व्यग्र होऊन जाते व कामविकाराच्या उपशमाचा
मार्ग त्याला माहित नसतो . अशावेळी त्याला स्वार्थ काय हे समजत नाही, परार्थ काय हे
समजत नाही आणि पुष्कळ दिवस परिचित असलेले प्रसंग त्याला आठवत नाही. गोष्टी
आठवत नाहीत. जेव्हा मनुष्याचे मन क्रोधाने पराजित झालेले असते किंवा आळसाने मंद
झालेलं असते, किंवा भ्रांत झालेलं असते , अशावेळी आपले आणि परक्याचे हित कशात आहे
हे मनुष्य यथार्थ रीतीने जाणत नाही आणि चिरकाल परिचित असलेल्या गोष्टी त्याला
आठवत नाही.

भांड्यातील पाण्यामध्ये नीळा किंवा काळा रंग टाकला असता त्यात आपली पडछाया दिसत
नाही, त्याचप्रमाणे ज्याचे चित्त कामविकाराने व्यग्र झाले असेल, त्याला आपल्या हिताचे ज्ञान
होत नाही. तेच पाण्याचे भांडे संतप्त झाले असता त्यांतून वाफा निघतील व पाणी उकळू
लागेल . अशावेळी मनुष्याला आपले प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसणे शक्य नाही. त्याचप्रमाणे
मनुष्य क्रोधाभित झाला असता त्याला स्वहित कशात आहे हे समजणे शक्य नाही . त्या
भांड्यातील पाणी जर शेवाळाने भरले असेल, तरी देखी; माणसांना आपले प्रतीबिंब त्यात
दिसणार नाही. त्याचप्रमाणे ज्याच्या मनाला आळसाने ग्रासले असेल, त्याला आपले हित
समजण्यासारखे नाही, मग परक्याचे हित समजणे तर बाजूलाच राहिले ! ते पाणी जरी
वाऱ्याने हलू लागले , तरी देखील त्यात आपले प्रतिबिंब दिसणार नाही . त्याचप्रमाणे ज्याचे
चित्त भ्रांत झाले असेल, त्यला स्वपरहित कशात आहे हे समजणार नाही. तेच पाणी जर
गढूळ झाले असेल, तरी त्यात देखील आपले प्रतिबिंब निट दिसणार नाही. त्याचप्रमाणे
ज्याचे चित्त संशयग्रस्त झाले असेल, त्याला आपले किंवा परक्याचे हिताहित समजणार
नाही. तेच पाणी जर स्वच्छ व शांत असेल, तर त्यात मनुष्याला आपले प्रतिबिंब स्पष्टपणे
पाहता येते. त्याचप्रमाणे ज्याचे चित्त कामछंद , व्यापाद ( क्रोध ) आळस, भ्रांतता आणि
संशयग्रस्तता या पाच आवरणांपासून विमुक्त झाले असेल ,त्यालाच स्वपरहित यथार्थ
रीतीने समजते .

 !!! नमो बुद्धाय !!!

No comments:

Post a Comment